तुमचे प्रश्न आणि दुःखाला वाचा फोडणार   

पूंछमधील नागरिकांना राहुल यांचे आश्वासन

पूंछ : काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी शनिवारी जम्मू आणि काश्मीरचा दौरा केला. त्या अंतर्गत पूंछला भेट दिली. पाकिस्तानने गेल्या महिन्यात या परिसरात तोफगोळ्यांचा मारा केला होता. त्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांची आणि जखमींची भेट राहुल यांनी घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. या प्रसंगी त्यांनी तुमचे दु:ख आणि वेदना देश पातळीवर मांडू, असे आश्वासन दिले.
 
पाकिस्तानी सैन्याने ७ आणि १० मे रोजी पूंछ शहर आणि परिसरात तोफगोळ्यांचा, क्षेपणास्त्रांचा आणि ड्रोनचा तुफान मारा केला होता. त्यात २८ हून अधिक नागरिकांचा मृत्यू तर ७० हून अधिक जखमी झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांची आणि जखमींची विचारपूस करण्याबरोबर त्यांचे सांत्वन करण्यासाठी राहुल गांधी काल आले होते. हल्ल्यात अनेकांनी जीव गमावला ही बाब अत्यंत दु:खद असल्याचे सांगताना ते म्हणाले, केवळनागरिकांना लक्ष्य करण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने  हल्ले केले होते. नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला. त्यांचे प्रश्न मी देश पातळीवर मांडणार आहे, अशी पोस्टही त्यांनी एक्सवर केली. हल्ल्यात घरे पडलेल्या आणि मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची मी भेट घेतली, देशप्रेमी नागरिकांच्या व्यथा ऐकून मला अतिव दु:ख झाले. त्यांचे धैर्य अवर्णनीय आहे. त्यांच्या र्धैर्याला मी नमन करतो, असेही त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले. या वेळी त्यांच्या सोबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तारीक हमीद कारा, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस जी. ए. मीर होते. 
 
दरम्यान, २२ एप्रिल रोजी पहालगाम येथील बैसरन खोर्‍यातील पर्यटनस्थळी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला करुन पर्यटकांना धर्म विचारुन ठार केले होते. या घटनेचे तीव्र पडसाद देशभर उमटले होते. यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातील ८ दहशतवादी तळ आणि ११ हवाई तळ भारताने उद्ध्वस्त केली होती. दहशतवादी हल्ल्यानंतर राहुल यांनी २५ एप्रिल रोजी पहलगामचा दौरा केला होता. तेव्हा मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला,राज्यपाल आणि अन्य जणांची भेट घेतली होती.  त्यानंतर काल त्यांनी पूंछचा केलेला दुसरा दौरा होता.

Related Articles